तरूणांच्या भविष्याशी खेळू नका अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात हुंकार आंदोलन
लोणंद/प्रतिनिधी.- सैन्य दलातील भरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात बिहार,
राजस्थान ,उत्तरप्रदेश हरियाणा, हिमाचल प्रदेश मध्ये आंदोलनाचा भडका उडालेला आहे.अग्निपथ ऐवजी सैन्यदलातील भरतीसाठी पूर्वीची पद्धत लागू करावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहणाऱ्या अनेक पक्ष आणि संघटना पुढं आलेल्या आहेत.
तरूणांच्या भविष्याशी खेळू नका. अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात हुंकार आंदोलन केले जाईल.असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) यांच्या देण्यात आलेला आहे.याबाबतचे निवेदन खंडाळा तहसीलदार यांना देण्यात आलेले आहे.यावेळी खंडाळा तालुकाध्यक्ष पवन धायगुडे, अरुण कोळेकर,विनायक धायगुडे आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात असे म्हटलेले आहे की,
'अग्निपथ' योजनेतंर्गत कंत्राटी सैनिक आणि समाजाचे लष्करीकरण करण्याचा अत्यंत घातक डाव केंद्र सरकारने रचला आहे. हा एक नवा घातक जुमला आहे. १० वी ते १२ वी मधील तरुणांना कंत्राटी पध्दतीने सैन्यात ४ वर्षे सरासरी महिना ३० हजार रूपये पगारावर अग्निवीर म्हणून नोकरी देण्यात येईल. यातील ७५ टक्के युवक ४ वर्ष विना निवृत्तीवेतन निवृत्त केले जातील. सैन्यदलात अत्यंत अत्यल्प पगारावर सैनिक घेण्याचा हा डाव आहे. तसेच गरीब युवकांना उच्च शिक्षणाकडे न जाता अल्प पगारावर जीव धोक्यात घालावा आणि नंतर बेकारी भोगावी.हे नियोजन केंद्र सरकारचे आहे. याचा तीव्र निषेध, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे.
पुढे असेही म्हटलेले आहे की,देशाचे पंतप्रधान हे विविध क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्यात पूर्ण अपयशी ठरल्याने त्यांनी हा नवा दुहेरी कुटील डाव रचला आहे. या अग्निपथ योजनेतील १०० टक्के जागा या उच्चवर्णीय तरुणांसाठी राखीव ठेवून पाहाव्यात किती भरते होते व किती देशासाठी बलिदान देण्यासाठी आपले करिअर सोडून पूढे येतात ते शक्य होत नाही म्हणूनच तरुणांच्या भविष्याशी खेळणा-या केंद्र सरकार विरोधात तीव्र आंदोल केले जाईल.असा इशाराही देण्यात आलेला आहे
-खंडाळा येथे निवेदन येताना पवन धायगुडे, अरुण कोळेकर,विनायक धायगुडे आदी उपस्थित होते.