निमगाव केतकी प्रतिनिधी - दत्तात्रय मिसाळ
भारतरत्न, गानसम्राज्ञी, गानकोकिळा लता मंगेशकर यांनी महाराष्ट्राचे व देशाचे नाव जगभरच्या संगीत क्षेत्रात सन 1942 पासून सतत तेवत ठेवले. त्या भारत देशाच्या भूषण होत्या. लतादीदीच्या जाण्याने विश्व संगीत क्षेत्राचे छत्र हरपले आहे, या शब्दात राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.
लतादीदींना आवाजाची देवाकडून जणूकाही देणगीच मिळालेली होती. त्यांचा सुरेल आवाज एकूण अनेकांच्या जीवनातील दुःखे दूर होत. त्यांनी देशातील मराठी- हिंदी सह एकूण 21 ते 22 भाषांमध्ये गाणे गायिले आहे. त्यांच्या गीतांची संख्या सुमारे 25 ते 30 हजार एवढी विक्रमी असावी. त्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सर्वात जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी जगातील एकमेव गायिका असा त्यांच्या नावाचा समावेश झाला आहे, ही बाब देशासाठी भूषणावह आहे. लतादीदींचा आवाज आगामी शेकडो वर्षे देशातील घराघरात घुमत राहील, असे गौरवोद्गारही हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण करताना काढले.