महत्वाची बातमी;एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन मागे घेतले
मुंबई – राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. हे आंदोलन करत एसटी वाहतूक सेवाही बंद ठेवण्याचा पवित्रा कर्माचाऱ्यांनी घेतला होता. यामुळे राज्यातील 150 पेक्षा जास्त एसटी महामंडळाच्या आगारातून एकही एसटी बाहेर पडली नव्हती.
दिवाळीच्या तोंडावर झालेल्या अशा आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे चांगलेच हाल झाले होते. अखेर मान्यताप्राप्त एसटी कर्मचारी संघटनेबरोबर परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चा केल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या एकुण तीन मागण्या होत्या. नव्या वेतन करारानुसार महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढवून द्यावा या दोन प्रमुख मागण्या होत्या. तर वेतन करारातील पगारवाढीचा मुद्दा आहे त्यावर दिवाळीनंतर चर्चा करण्यात येईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. तेव्हा या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असेही आवाहन परब यांनी केले.
तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांची शासन मान्यताप्राप्त प्रमुख संघटना महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी या निर्णयांवर समाधान व्यक्त करत एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.